बुलढाणा/ महान कार्य वृत्तसेवा
राज्यासह पुण्यात जीबीएसचा कहर सूरूच आहे. पुण्यासोबत या आजाराने आता इतर जिल्ह्यात हायपाय पसरायला सुरूवात केली आहे.त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत वाढत होत चालली आहे. त्यामुळे जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता आता केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता जर रुग्णसंख्या वाढली तर कोणत्याही क्षणी निर्बंध येण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, जीबीएस आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून हा आजार काहीसा जीवघेणा ठरत आहे. त्यात जर जीबीएस हा आजार संसर्गजन्य असेल तर तात्काळ अधिकारी डॉक्टर यांची बैठक घेऊन राज्यात होणाऱ्या गर्दीच्या यात्रावर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत.
जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचे कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरतोय. जीबीएस सामान्यत व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दुषित किंवा कमी शिजलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्दजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने या जीवाणूच लागण होते.
दरम्यान सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन संशयित जीबीएस रुग्णांची नोंद केली.ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 210 झाली आहे. या संशयित रूग्णांपैकी 182 रूग्णांना जीबीएसची पुष्टी झालेले रुग्ण असल्याचे निदान झाले आहे,असे आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांपैकी 42 रूग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. 94 रुग्ण पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. 32 रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आहेत, 32 रूग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत आणि 10 रूग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.आजपर्यंत,राज्यात आठ संशयास्पद जीबीएस मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त चार मृत्यूंना जीबीएस मृत्यू म्हणून पुष्टी मिळाली आहे आणि उर्वरित चार मृत्यू संशयास्पद आहेत,” असे डॉ. कमलापूरकर म्हणाले. आतापर्यंत 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 41 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत आणि 20 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
