खेळ

Spread the love
सिडनी कसोटी एका रोमांचक मोडवर, दुसऱ्या दिवशी पडल्या 15 विकेट! टीम इंडियाकडे 145 धावांची आघाडी 

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस (4 जानेवारी) अतिशय रोमांचक होता आणि एकूण 15 विकेट पडल्या आणि 300 हून अधिक धावा झाल्या. एकूणच दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर होता आणि फलंदाज संघर्ष करताना दिसले. तरीही भारत या सामन्यात पुढे दिसत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे चार धावांची आघाडी होती. म्हणजे एकूणच आघाडी 145 धावांची झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रवींद्र जडेजा आठ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. राहुलला (13 धावा) आणि यशस्वीला (22 धावा) बोलंडने आऊट केले. शुभमन गिल 13 धावा करून वेबस्टारच्या चेंडूवर आऊट झाला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याला सहा धावा करता आल्या. बोलंडने पुन्हा एकदा कोहलीची शिकार केली. पंतने 33 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी नितीश रेड्डी सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत, तर कमिन्स आणि वेबस्टरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

त्याआधी ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या दिवसाही खराब सुरुवात झाली. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला अवघ्या 15 धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच धक्का दिला. यानंतर दिवसाच्या नवव्या षटकात मोहम्मद सिराजने सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनाही बाद करून ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. 39 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर होता.

यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथने पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरसोबत पाचव्या विकेटसाठी 57 दिवसांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाची धुरा आपल्या हाती घेतली. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने स्मिथला 33 धावांवर आऊट करून भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतर ॲलेक्स कॅरीने 21 धावा केल्या आणि वेबस्टरसोबत 41 धावांची आणखी एक महत्त्वाची भागीदारी केली.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी 

दुसऱ्या सत्रात केवळ एकच षटक टाकल्यानंतर बुमराह मैदानाबाहेर गेला होता, मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चार विकेट केवळ 44 धावांत गमावल्या. भारताकडून सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी तीन तर बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

सामन्यात न खेळताही रोहित शर्मा मैदानात उतरला

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये अनेक वेळा टीम इंडियाच्या आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कधी ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराज आमनेसामने आले तर कधी विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टासमधील वाद चर्चेत आला. सिडनीत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातील वातावरणही असेच होते. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात बाचाबाची झाली. आता या प्रकरणी रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार आहे, असे रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले आहे.

तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार…
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात बाचाबाची झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या लंच बेकनंतर स्टार स्पोर्ट्‌‍सवर बोलताना रोहित शर्माला याबाबत विचारले असता, त्याने सडेतोड उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला, ‘आमची पोर जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार आहे’.
बुमराह-कॉन्स्टासमध्ये नक्की काय झाला वाद?
ही संपूर्ण घटना पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. बुमराह ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसरे षटक आणि पहिल्या दिवसाच्या खेळातील शेवटचे षटक टाकत होता. ओव्हरचा पाचवा चेंडू टाकण्यासाठी बुमराह पळत आला, तेव्हा स्ट्राईकवर असलेला उस्मान ख्वाजा तयार नव्हता. पुन्हा एकदा बुमराह बॉल टाकण्यासाठी तयार झाला पण पुन्हा ख्वाजाला उशीर करत होता. मग बुमराह थोडा रागवला. दरम्यान, नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या सॅम कॉन्स्टासने कोणतेही कारण नसताना बुमराहला काहीतरी म्हणाला. त्यानंतर दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसले. यानंतर पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.
हा वाद इथेच थांबला नाही. यानंतर बुमराहने एक बॉल टाकला जो डॉट राहिला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर बुमराह आला आणि त्यावर त्याने ख्वाजाची विकेट घेतली. बुमराहने विकेट घेताच तो रागाने कॉन्स्टासकडे गेला आणि मग थांबला. यानंतर भारतीय खेळाडूंनीही कॉन्स्टाससमोर विकेटचा आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *