पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
पुलाची शिरोली येथील उरुसा निमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी झालेल्या वादातून बैलगाडी मालक असलेल्या दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये मारहाण करणाऱ्या चौघांच्यावर तब्बल तीन आठवड्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बैलगाडी मालक सुदर्शन नाना कदम, अमोल नाना कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज मानसिंग पाटील, शैलेंद्र शशिकांत पाटील, श्रीधर पाटील, रोहित तथा गोटू कौंदाडे या चौघांवर शनिवारी रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ५ मे रोजी शिरोली यात्रा आणि उरुसानिमित्त वीट भट्टी माळावर कमिटीच्या वतीने बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुदर्शन आणि अमोल कदम या भावांनी आपली बैलगाडीसह भाग घेतला होता. अंतिम टप्यात शर्यतीच्या नियमावरून कदम बंधू आणि मनोज पाटील यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करून मारामारी सोडवली. त्यानंतर कदम बंधू बैलगाडी टेंपोत भरत असताना मनोज पाटील याने सुदर्शन कदम यास लोखंडी रॉड आणि पाईपने बेदम मारहाण केली. यावेळी अडवण्यास आलेल्या अमोल कदम यालाही मारहाण केली. यावेळी मनोज पाटील व त्याच्या साथीदारांनी कदम बंधूना शिवीगाळ करीत घट्ट पकडून ठेवले होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन व अमोल कदम यांना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.
उपचारानंतर सुदर्शन कदम यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेल्यानंतर पोलीसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे सांगितले. त्यानंतर कदम यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत जिल्हा पोलीस प्रमुखाकडे दाद मागणार असल्याचे वकीलांमार्फत शिरोली एमआयडीसी पोलीसांना कळविल्यानंतर अखेर २४ मे रोजी रात्री उशीरा मनोज पाटील, शैलेश पाटील, श्रीधर पाटील, रोहित कौंदाडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा अधिक तपास सपोनि. सुनिल गायकवाड यांच्या मागदर्शना खाली हवालदार शिंदे करीत आहेत.
