मयताच्या वारसदारांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन
मिरज/महान कार्य वृत्तसेवा
मिरज तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन मंगळवार दि. २२ रोजी सायंकाळी गारपीट झाली होती. यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी (वय ३३, रा. आरग, ता. मिरज) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज सोमवार दि.२८ रोजी माजी पालकमंत्री व आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी आरग येथे माळी कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करून त्यांची विचारपूस केले. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी व्यक्त केले. तसेच माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला. तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असे आ.खाडे यांनी सांगितले.
घरातील कर्ता तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले.
यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी, प्रतीक पवार, माजी उपसरपंच सुभाष माळी, किरण पाटील, नारायण माळी, माजी उपसरपंच उत्तम पाटील, संजय नागठाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.