मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री एक तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटलांनी बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून त्यावेळी भाजपचा एक ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित होता अशी माहिती सूत्रांनी दिली. पण ही भेट व्यक्तिगत कामासाठी असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी भाजपचा एक ज्येष्ठ नेताही उपस्थिती होता. या तिघांमध्ये एक तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती आहे.
जयंत पाटील शांत-शांत
मस्साजोगचे प्रकरण असो वा साहित्य संमेलनातील वाद असो, राज्यात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना जयंत पाटील मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तरीही ते कोणत्याही घडामोडीवर प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळेच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी ज्यावेळी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळी जयंत पाटील हे आपल्यासोबत यावेत असं अजित पवार यांना वाटत होतं. पण जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मात्र जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे जयंत पाटील यांची कुचंबना होत असल्याची चर्चा आहे.
यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, ”काही दिवसांपूर्वी राजारामबापू पाटील कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी आले होते. त्यावेळीही त्यांची देहबोली सगळं काही सांगत होती. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे जयंत पाटील हे अस्वस्थ आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी जर असा काही निर्णय घेतला तर त्यावर काही आश्चर्य वाटणार नाही.”
