मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
दहावी बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या परीक्षा करियरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. काही दिवसांपूर्वीच या परीक्षेच्या हॉलतिकीटांचे वाटप करण्यात आले होते. या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्यांच्या नावासह त्यांच्या जातीचा सुद्धा उल्लेख केला होता. यावरून राज्य शिक्षण मंडळावर अनेकांनी टीका केली अखेर शिक्षण मंडळाने हा निर्णय रद्द केला आला आहे.
महाविद्यालयात राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12 वीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रिकांचे वितरण सुरू झाले. त्यावर जातीचा उल्लेख केला गेला होता. त्यातच काही विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद चुकीची असल्याचेही निदर्शनात आले. शाळेत प्रवेश घेताना जातीची चुकीची नोंद झाली असेल आणि पुढील प्रवेशासाठी विशिष्ट प्रवर्गातून प्रवेश घ्यायचा असेल तर जातीची योग्य नोंदणी आवश्यक असते. शाळेतील जातीची नोंद कळावी त्यामध्ये सुधारणा असल्यास शाळा सोडल्याचा दाखला घेताना त्यावर सुधारित जात यावी अशा उद्देशाने मंडळाने जातीचा उल्लेख केला होता. मात्र आता लोकभावनेचा आदर करत, तो मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे. येत्या 23 तारखेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना नवीन हॉलतिकिटे ॲडमिट कार्डच्या लिंकद्वारे डाऊनलोड करता येईल. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 20 जानेवारीपासून हॉलतिकीट देण्यात येतील.