जयसिंगपूर/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात पण शेतकर्यांसाठी देखील साहित्य संमेलन भरवून त्यामध्ये शेतकरी व शेती संदर्भात चर्चा घडवून आणणारे 12 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूरमध्ये घेण्याचा मान शरद कृषी विद्यापीठ व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूहाला मिळाला आहे. याच माध्यमातून आठ व नऊ फेब्रुवारी 2025 रोजी सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर या ठिकाणी दोन दिवसाचे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे साहित्य संमेलन व्हावे यासाठीची मागणी या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संयोजक मुंबई हायकोर्टातील विधिज्ञ अॅड. सतीश बोरुलकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने आपण ते संमेलन पार पाडीत आहोत असे सांगताना या संमेलनाच्या माध्यमातून दोन दिवस केवळ शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भातील परिसंवाद, चर्चासत्रे, प्रबोधनपर व्याख्यान, महाराष्ट्राच्या शेतीची सद्यस्थिती, कवी संमेलन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील अनेक मान्यवर शेतकरी व शेती तज्ञ सहभागी होणार आहेत. शेतीप्रधान पश्चिम महाराष्ट्रासाठी हे संमेलन मार्गदर्शक ठरेल. यापूर्वी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून 2015 पासून अशा प्रकारच्या संमेलनाची सुरुवात झाली असून आजपर्यंत अकरा शेतकरी साहित्य संमेलने पार पडली आहेत. या बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहनही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संमेलनाच्या कार्याध्यक्षानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड केली आहे.
