संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
बीड/महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. तर सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीला रामदास आठवले यांच्या समोरच संताप अनावर झाल्याचे दिसून आले.
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख म्हणाल्या की, मला तर अक्षरश: असं वाटतंय की, मीच जाऊन कुणाकुणाला मारावे. मला इतकी वेदना सहन होत नाहीय. आम्ही काय पाप केलं होतं की, आमच्यावर ही वेळ आलेली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मला शासनाने सांगावे, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन, इतकी माझ्यात हिंमत वाटायला लागली आहे, असा संताप त्यांनी रामदास आठवले यांच्यासमोर व्यक्त केला.
संतोष देशमुख प्रकरणी अमित शाहांची भेट घेणार : रामदास आठवले
दरम्यान, रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे. या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. मी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले असले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. ही फार गंभीर बाब आहे. तर या प्रकरणातील सोनवणे यांनी तक्रार केल्यानंतर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर आज ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
