Spread the love

ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा दावा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना होत आला. आता कुठे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, डिसेंबर महिना संपत आला, तरी काही महिलांना अद्यापही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचेही बोलले जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केला आहे. ”आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल”, असे विनायक राऊतांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
विनायक राऊत काय म्हणाले?
”महाराष्ट्रात आताच काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. तसेच इतर बाकीच्या ज्या सोई सुविधा मिळत असतात त्यावरही परिणाम होत आहे. लाखो-कोरोडो रुपयांच्या कर्जांत महाराष्ट्र डुबला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान अर्थमंत्री अजित पवार कसं पेलवतील याबाबत प्रश्न आहे”, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी महायुतीच्या सरकारवर केला आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी म्हटलं की, ”महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत हा प्रयोग (लाडकी बहीण योजना सुरु ठेवतील) ते नक्की करतील. मात्र, नंतर ही योजना (लाडकी बहीण योजना) ते (महायुती सरकार) कायम स्वरुपी बंद करतील”, असे मोठे विधान विनायक राऊत यांनी केले.