Spread the love

पुणे 4 मे
लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारसंघात 7 मे आणि 13 मे अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत काही नगरसेवक मला काय त्याचे या आविर्भावात आहेत. प्रचाराकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. अशा नगरसेवकांनो, तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे, अशा खरमरीत शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकार्यश्रम नगरसेवकांचे कान टोचले.
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठीचे मतदान 7 मे रोजी, तर उर्वरित पुणे, शिरूर, मावळ या मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. याठिकाणी महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आणले पाहिजेत आणि जो काम करेल, त्याचा निकाल शंभर टक्के उत्तम असणार आहे, त्यामुळे त्यांच्या पाठिशी मी आहे. मात्र ‘भाजपा’ नाही म्हणून मित्रपक्षांचे चिन्ह पोहोचले नाही, अशी कारणे नको आहेत. पण, पुण्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे, असेही फडणवीस यांनी बजावून सांगितले.
पुण्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये महायुतीच्या कार्यकर्ते आणि आजी- माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी देखील हजेरी लावली आणि जे पदाधिकारी गैरहजर होते, ते का हजर नाहीत, याची माहिती यावेळी फडणवीस यांनी यावेळी घेतली. या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या सोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी प्रचाराच्या वेळेस केलेल्या हलगर्जीपणाविषयी फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘या प्रचारामध्ये माझी सर्वांवर करडी नजर आहे. त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कोण काय करत आहे, याची थेट माहिती मला मिळत आहे. प्रचारामध्ये छोट्या सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अगदी 15 ते 20 नागरिकांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. अशा लहान- मोठ्या सभांचा फायदा नागपूरमध्ये उत्तम झाला आहे. नागपुरात लहान-मोठ्या सभांतून 9 लाख नागरिकांपर्यंत थेट पोहोचता आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पुण्यात देखील अशाच प्रकारे लहान-मोठ्या सभेतून प्रचार आवश्यक आहे. पुढील आठवडाभरात मोठ्या संख्येने अशा सभा पार पाडायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी करत असताना कोणाला काही अडचण असेल, तर त्या सोडविण्यासाठी याठिकाणी चंद्रकांत पाटील असल्याचे सांगितले. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघातील काम व्यवस्थित करायचे आहे, असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी नगरसेवकांना खडसावले.