Spread the love


मुंबई,17 मार्च
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज शिवाजी पार्क येथे समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीने या सभेतून फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले की, राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी आपण येथे आलोय. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशातील लाखो लोकांना भेटले. आजच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येने लोकं उपस्थित आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे देशात सध्या जी परिस्थिती आहे . यात बदल करण्याची गरज आहे. हा बदल आपण सर्व जण एकत्र येऊन आणू शकतो.
कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही
ज्या सरकारने जनतेला वेगवेगळे आश्वासन देऊन फसवले. त्या सरकारला हटवण्यासाठी आपल्याला ज्या दिवशी मतदानाची संधी मिळेल, त्या दिवशी आपल्याला पाऊल उचलावे लागेल. आपण पाहतोय की ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी देशाला अनेक आश्वासने दिले. शेतकèयांना, कामगारांना, तरुणांना, महिलांना, दलित आणि आदिवासी जनेतला अनेक आश्वासने दिली होती. मात्र कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही.
दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढलं पाहिजे
जे लोक आश्वासन देतात आणि पूर्ण करत नाहीत, त्यांच्याविरोधात आपल्याला एकत्र यायला हवे. गेल्या काही दिवसांपासून आपण टीव्हीवर एक गोष्ट ऐकतोय, मोदी की गॅरंटी. पण ही गॅरंटी चालणार नाही. या गॅरंटीत सिक्युरिटी नाही. त्यामुळे चुकीची गॅरंटी देत, चुकीचे आश्वासन देत त्यांनी भरकटवण्याचा प्रयत्न केला. दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढलं पाहिजे.
आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ
आजपासून टीव्हीवर गॅरंटी येणार नाही. गॅरंटीला रोखण्याचे काम निवडणूक आयोगाने केले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होते. पण आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.