Spread the love

राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली तपोवन मैदानाची पाहणी

‌कोल्हापूर,3 जून
‌’शासन आपल्या दारी‌’ अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रित तपोवन मैदानाची पाहणी केली.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करा. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्या. मैदानावर व व्यासपीठावर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व संपल्यावर नागरिक बाहेर पडताना गर्दी होवू नये व वाहतूक कोंडी होवू नये यासाठी योग्य नियोजन करा.
नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, कडक उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिक, लाभार्थी व मान्यवरांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. कार्यक्रम स्थळी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करा. कार्यक्रम मंडपात येण्यासाठी प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावर संरक्षण स्कॅनर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अन्य आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित राहणारे नागरिक व अतिथींच्या वाहनांकरिता स्वतंत्र वाहनतळ करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची व वाहनांची संख्या विचारात घेऊन याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.