Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन येणार असल्यासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ”मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्याने माहिती द्यायची गरज नाही. विधानसभा निवडणुकांआधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा. यापेक्षा जास्त मी बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी नोंदवली आहे.

”मुंबई ही मराठी माणसाची आहे .मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देते तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची अधिकार आहे. मग ते कोणीही असो! या मुंबई शहरात कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यासाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत आंदोलन करत असेल तर त्यात गैर काय? ही राजधानी मराठी माणसाची आहे. त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्री यांनी आंदोलकांशी संवाद साधने गरजेचे आहे. गणपतीमध्ये मुंबई कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

”राजकारण आम्ही करत नाही. राजकारण जे आहे जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं. तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम करतात. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारली. मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी, 92 कुळी, 96 कुळी जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं. त्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं.” असा घणाघाती आरोप राऊतांनी केला.

”आज जातीजातीमध्ये आग लागली आहे असं चित्र कधी नव्हतं. हे या राज्याचे दुर्दैव आहे. रोज कुठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे,” असंही राऊत म्हणाले.

”मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात समाज आहे. त्यांच्या समाजाच्या काही मागण्या आहेत. रोजगारासंदर्भात, आर्थिक अडचणीसंदर्भात ते सरकारकडे मागणी करणार आहेत. ते प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडे काही मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही. ते नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहेत. उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल किंवा दुसरा मुख्यमंत्रीकडे त्याच्याकडे मागण्या मागतील. उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील दुसरे कोणतेही असतील तर त्यांच्याकडे मागणी मागतील व्यक्तीकडे मागत नाही तुम्ही त्यांचे पालक आहात. तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईकडे आले आहेत तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल,” अशी आठवण राऊतांनी करुन दिली.