नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेतून सरकार पुढे जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार अपमान केला जातोय. त्यांचा अपमान आता महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवासस्थानी बाप्पाची स्थापना झाली. कोराडी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. यावर्षी पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांनी सहकुटुंब विधिवत बाप्पाची पूजा केली. तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी देण्याची बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
गणेशोत्सवानंतर आंदोलन करायला पाहिजे- मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा सर्वांच अधिकार आहे. मात्र, राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आले असते तर योग्य झाले असते. ज्या राजकीय पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे, त्यांनीही याचा विचार करायला हवा होता. हिंदूच्या सर्वात मोठ्या उत्सवात गालबोट लागू नये, सेयाची काळजी घ्यायला पाहिजे, असे मतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
नुकसानीचे पंचनामे झाले- अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे जवळपास झाले असून अपलोड झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदतीची कार्यवाहीदेखील सरकार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळच्या बैठकीत सर्व पालकमंत्र्यांना यासंबंधीची दखल घेण्यात सांगितलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त कोकणातील वेंगुर्ले येथे गवळी वाडा फ्री होल्ड करण्याचा शासन निर्णय आम्ही जाहीर केला. नागपूर आणि अमरावती येथील नझुलच्या जागेवर असलेल्या घरांना त्यांच्या जागेचे मालकी पट्टे देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महसुली पंधरवडा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत आम्ही महसुली पंधरवडा साजरा करणार आहोत, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
ठाकरे कुटुंबाच्या भेटीला राजकीय अर्थानं बघू नये:- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, या भेटीला राजकीय अर्थानं बघू नये. दोन कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत असतात. यंदाचं वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सरकारची काळजी वाढली- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज (27 ऑगस्ट) बुधवारी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ते मुंबईत 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन सुरू झाल्यामुळं सरकारची काळजी वाढली आहे. अशा परिस्थितीत आंदोलनाचा इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं आहे.
