Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुण्यातील रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर विविध मुद्यांवर भाष्य केले. ”मी आयुष्यात कधीच ड्रग्स घेतले नाही,” असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, पोलिसांनी आधीपासूनच प्रांजल खेवलकरांवर लक्ष ठेवले होते, असा आरोप देखील त्यांनी केलाय. तर खडसेंची त्यांच्या घरात पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील तीन पोलीस अधिकारी पत्रकार असल्याचे भासवून आतमध्ये आले. या गोष्टीला एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे.

माझ्यावर पाळत का ठेवली जातेय?

एकनाथ खडसे म्हणाले की, माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे, असे हल्लाबोल त्यांनी केला आहे.

बदनामी करण्यामागे नेमकं हेतू काय?

दरम्यान, एकनाथ खडसे म्हणाले की, 27 जुलै रोजी सकाळी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला आणि एकनाथ खडसेंचे जावई अटकेत असल्याची बातमी सर्वांनाच माहीत आहे. मात्र, या कारवाईबाबत माझ्या मनात काही प्रश्न आहेत. सात जणांची पार्टी सुरु होती, तिथे ना संगीत होतं, ना डान्स, फक्त सात जण एका घरात बसले होते. अशा परिस्थितीत याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का? जर हीच व्याख्या असेल, तर राज्यात कुठेही पाच-सात जण घरात एकत्र आले की त्यालाही रेव्ह पार्टी म्हणावं लागेल. त्यामुळे, पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’ असा उल्लेख करून बदनामी करण्यामागे नेमकं काय हेतू होता, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. तसेच, रेव्ह पार्टीची स्पष्ट व्याख्या काय आहे, हे मला पोलिसांना विचारायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.