Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मद्य घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंखे याला अटक केली. हा अटक करण्यात आलेला अमित साळुंखे शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला होता. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखेचा विषय सुमित फॅसिलिटी हा मी वारंवार सांगतोय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलत आहे ते गांभीर्याने घ्या. नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील. इतकं गंभीर हे प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटी हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ही कंपनी कोणाची आहे? श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजे उपमुख्यमंत्री यांचे बाळराजे. त्यांचे मेडिकल फाउंडेशन चालते. फार मोठी सामाजिक सेवा करता आहेत. या मेडिकल फाउंडेशनमधला पैसा हा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कारण अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट गैरमार्गाने देण्याचे शिंदे पिता-पुत्राने केले आहे, असा आरोप त्यांनी केलाय

शिंदे पिता-पुत्राने सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून हजारो कोटीचे घोटाळे केले

संजय राऊत पुढे म्हणाले की, मद्यघोटाळा समोर आला, त्या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर 800 कोटीच्या ॲम्बुलन्स टेंडरमध्ये फार मोठा प्रमाणात घोटाळा झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचे साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राने सुमित फॅसिलिटीला दिले. इतके धडाधड कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे मिळत गेले, याचे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मद्यघोटाळ्यातला पैसा, टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना याचे गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत हे विसरून जायला पाहिजे. हजारो कोटीचे घोटाळे सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पिता-पुत्राने केले आहेत. त्यामुळे त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक एसआयटी स्थापन करायला पाहिजे. त्यांना एसटी स्थापन करण्याचा छंद आहे. त्याचे पुढे काय होते आम्हाला माहित नाही? पण इथे त्यांनी एसआयटी स्थापन करावी आणि त्याला कालमर्यादा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीसांचे सरकार कॅरेक्टरलेस

राज्यातील वादग्रस्त मंत्री मंत्र्यांच्या फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे कॅरेक्टर लेस सरकार आहे. चारित्र्यहीन सरकार आहे. याला जबाबदार स्वत: देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचा मधल्या काळात वाढदिवस झाला, त्यांच्या गुणांचा गौरव करणारी स्मरणिका आली. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर फुले उधळली. त्या फुलांचा वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मी चारित्र्यवान सरकार चालवत आहे, यासाठी त्यांना काम करावे लागेल.

त्यांच्या कॅबिनेटमधला मंत्री डान्सबार चालवतो. स्वत: गृहराज्यमंत्री डान्सबार चालवत आहेत. एक मंत्री सिगारेटचा धूर सोडत उघडा बसला आहे आणि पैशाच्या उघड्या बागा कपाटात भरलेल्या आहेत. तो दाखवत आहे की, आम्ही किती पैसेवाले आहोत, लुटमार करणारे आहोत. एक मंत्री टॉवेलवर मारीमारी करतो, एक मंत्री रमी खेळत आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर आहे. ही नैतिकता आहे. यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावर जी स्मरणिका आहे, त्यातील लेख परत वाचा. जी फुले उधळली आहेत, ती प्लास्टिकची आहेत ही खरी आहेत ते बघा. हे समजून घ्या आणि राज्य चालवा. 

फडणवीस कुणाला घाबरत आहेत?

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री युजलेस आहेत. ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करत आहेत. त्यांना मंत्रीपदाचे आणि आपल्या कामाचे भान नाही. लुटमार करण्यासाठी त्यांना शपथा दिल्या आहेत. गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? विरोधी पक्ष सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करत आहेत. कारण त्यांची मजबुरी आहे. ते कुणाला घाबरत आहेत का? त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का? आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चारित्र्यवान माणूस हे सहन करतोय, त्याच्या कार्यकुशलतेवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केली आहे, असा माणूस हे सगळं सहन करतो, हे मला धक्कादायक वाटते, असा खोचक टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे