मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख ‘गोविंदां’साठी विमा संरक्षण जाहीर केलंय. गोविंदाचा मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. उत्सवाच्या एक महिन्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा (लहान मुले) मानवी मनोरे तयार करतात आणि उंचीवर टांगलेल्या दूध, दही आणि लोणीने भरलेली मटकी फोडतात. दहीहंडी उत्सवात नुकसान झालेल्या गोविंदांना सरकारच्या विमा योजनेचा फायदा होणार आहे.
विमा संरक्षणाचा खर्च सरकार उचलणार : बुधवारी जारी केलेल्या जीआरनुसार, यंदा 16 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या उत्सवादरम्यान मानवी मनोरे तयार करून दहीहंडी लावणाऱ्या नोंदणीकृत सहभागींच्या विम्याचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. गोविंदांचे प्रशिक्षण, वय आणि सहभाग पडताळण्यासाठी आणि त्यांची माहिती पुणे येथील क्रीडा आणि युवा सेवा आयुक्तांना सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गोविंदा संघाची नियुक्ती करण्यात आलीय. जीआरमध्ये अपघातांच्या सहा श्रेणी आणि त्यानुसार विमा देयकांचा उल्लेख आहे.
या 6 श्रेणी विम्यात समाविष्ट केल्या जाणार : दहीहंडी उत्सवादरम्यान मृत्यू झाल्यास मृत गोविंदाच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मिळतील. दोन्ही डोळे किंवा दोन अवयव गमावणे यांसारखं अपंगत्व आल्यासही हीच रक्कम दिली जाणार आहे. एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावलेल्या गोविंदाला 5 लाख रुपयांच्या भरपाईसाठी दिले जाणार आहेत. जीआरनुसार, अंशत: किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीच्या टक्केवारी आधारित अपंगत्वाच्या मानक श्रेणींनुसार भरपाई दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त विमा योजनेत उत्सवादरम्यान झालेल्या दुखापतींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च समाविष्ट असणार आहे. सहभागींची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करताना पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे.
