मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 20 जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केल्याचे समजते. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जिल्हाध्यक्ष सांगत आहेत.
”शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील. तसेच, विकासाच्या कामातही मदत होईल”, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला. लवकरच हे 20 जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
महायुतीचे महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित
महायुतीने महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 44, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला 33 आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 23 महामंडळं आली आहेत.
