नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली, ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या भीषण अपघातातील मृतांची यादी आता समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत गावाकडे जात असताना, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
धडकेनंतर अल्टो कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. कारमध्ये पाणी भरल्यामुळे नाका व तोंडात पाणी गेल्याने श्वास घेता न आल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अपघातातील मृतांची नावे
दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये देविदास पंडित गांगुर्डे (28), मनीषा देविदास गांगुर्डे (23), भावेश देविदास गांगुर्डे (2) हे तिघे सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी आहेत. तसेच, उत्तम एकनाथ जाधव (42) व अल्का उत्तम जाधव (38) हे कोशिंबे, ता. दिंडोरी येथील रहिवासी असून, दत्तात्रेय नामदेव वाघमारे (45) व अनुसया दत्तात्रेय वाघमारे (40) हे देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी येथील रहिवासी होते.
अपघातातील जखमींची नावे
या अपघातात मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे (25) आणि अजय जगन्नाथ गोंद (18) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय गोंद हे मूळचे नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर येथील असून सध्या ते सातपूर येथील भोला पिंपळगाव परिसरात राहतात.
दिंडोरीतील अपघातावरून भास्कर भगरेंचा आरोप
दरम्यान, दिंडोरी येथील अपघातावर खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर आरोप केलाय. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भास्कर भगरे यांनी केली आहे. याच परिसरात अनेक वेळा अपघात झालेत. मात्र, बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्ता चौपदरीकरण करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. पण, अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय नाही. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित करणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
