Spread the love

वाशिमच्या सरकारी रुग्णालयातील प्रकार

वाशिम / महान कार्य वृत्तसेवा

वाशिमच्या सरकारी रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका रुग्णाच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची चक्क त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्हा रुग्णालयात 19 मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. डॉक्टरांनी या घटनेमागे ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचे सांगत ती अनावधानाने घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा इत्यादि उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परिणामी, रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नसले तरी या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली. त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशीम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखविला. तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही पोट दुखतच राहिले. अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले, तेव्हा तपासणी अंतिम सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे.

वसईतील नायगाव येथील खोचीवाडा परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय विनीत विजय किणी याचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी मुंबईतील रहेजा रुग्णालयात उपचार घेत असताना प्राण सोडला. विनीत किणी यांना काही दिवसांपासून तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर तपासणीमध्ये त्यांना संशयित कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान त्यांना तातडीने रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आणि शनिवारी त्यांचा मृतदेह राहत्या घरी न आणता मुंबईतच अंतिमसंस्कार करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असतानाच पुन्हा अशा घटनांमुळे वसई-विरार परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नसून नागरिकांनी अजूनही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे वसई-विरारमध्ये करोना पुन्हा डोकं वर काढत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग याबाबत काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.