पंजाबच्या खेळाडूने श्रेयस अय्यरबद्दल केला खुलासा, ‘पहिल्या बैठकीत त्याने…
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्स संघ 2011 नंतर पहिल्यांदाच प्लेऑफसाठी पात्र झाला आहे. 29 मे रोजी पंजाबचा सामना बंगळुरु किंवा गुजरात टायटन्सशी होणार आहे. मेगा लिलावाआधी संघाने रिटेन केलेला शशांक सिंग याने संघाच्या यशाचं श्रेय कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला दिलं आहे. दोघांनी ड्रेसिंग रुममध्ये निर्माण केलेलं वातावरण, संस्कृती यामुळेच संघाला हे यश मिळाल्याचं तो म्हणाला आहे.
सोमवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव करून टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केले. जोश इंग्लिस आणि प्रियांश आर्य यांनी जबरदस्त कामगिरी करत पंजाब संघाला सात विकेट्स आणि नऊ चेंडू शिल्लक असताना 180 धावांचं आव्हान पूर्ण करण्यात मदत केली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना शशांक सिंग म्हणाला की, अय्यर आणि पॉन्टिंग पंजाब किंग्जमधील प्रत्येक सदस्याला समान आदर देतात.
यादरम्यान त्याने एक किस्सा सांगितला, जेव्हा पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर आणि रिकी पाँटिंग यांनी संघातील वरिष्ठ खेळाडू युझवेंद्र चहल आणि बस चालकाला समान वागणूक दिली जाईल असं स्पष्ट केलं. ”पहिल्या दिवशी रिकी पाँटिंग आणि श्रेयस या दोघांनी आम्हाला सांगितलं की, ते युझवेंद्र चहलसारखा वरिष्ठ खेळाडू आणि बस चालकाला समान पद्धतीने वागवणार. त्यांनी याचं पालनही केलं,” असं तो म्हणाला.
”त्यांनी युजवेंद्र चहल आणि आमच्या बस ड्रायव्हरलाही तोच आदर दाखवला आहे, जो संघाबद्दल बरंच काही सांगतो,” असं तो पुढे म्हणाला. शशांकने संघ संस्कृती बदलण्यात आणि पंजाब किंग्ज संघातील सर्व सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात रिकी पाँटिंगची कशी भूमिका आहे याबद्दलही सांगितलं.
”त्याने संघ संस्कृती बदलली आहे. त्याने आमची मानसिकता बदलली आहे. त्याने आमचे विचार बदलले आहेत. म्हणून, या सर्व गोष्टींचे श्रेय त्यालाच द्यायला हवे. कारण, अर्थातच, त्यानेच खेळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. त्याने संस्कृती बदलली. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचा आदर करणं. या सर्व गोष्टी सांगणं खूप सोपे आहे,” असं शशांक म्हणाला.
”अर्थात, तुम्हाला हे करावे लागेल, तुम्हाला ते करावे लागेल. पण पुन्हा, ते सर्व करणं एक वेगळी गोष्ट आहे. म्हणून, त्याने ड्रेसिंगमध्ये संस्कृती निर्माण होईल याची खात्री केली,” तो पुढे म्हणाला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणं सर्वोत्तम गोष्ट
यस अय्यर हा प्लेऑफमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला कर्णधार आहे. त्याने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्रथम अंतिम फेरीत नेलं, त्यानंतर 2024 मध्ये केकेआरसोबत स्पर्धा जिंकली आणि आता त्याने 2011 नंतर पहिल्यांदाच पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये नेलं आहे.
आयपीएल 2025 मध्ये 149.47 च्या स्ट्राईक रेटने 284 धावा काढणाऱ्या शशांक सिंगने श्रेयसचे कौतुक करताना म्हटलं आहे की, त्याच्या नेतृत्वाखाली खेळणं ही त्याच्या आयुष्यात घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.
”श्रेयस हा फार चांगला मित्र आहे. मी त्याला 10-15 वर्षांपासून ओळखतो. पण त्याच्या नेतृत्वात खेळणं माझ्यासोबत घडलेली सर्वोत्तम बाब आहे. तो संघातील प्रत्येकाला मोकळीक देतो,” असं शशांक म्हणाला. ”आणि जेव्हा मी सर्वांना म्हणतो, तेव्हा एकूण 25 जण असतात, तसंच सपोर्ट स्टाफ, कंटेंट टीम, मीडिया टीम, लॉजिस्टिक्स, सर्वजण असतात. तो ज्या पद्धतीने त्यांना स्वातंर्त्य देतो ते त्याच्याबद्दल खूप कौतुकास्पद आहे. त्याने संघात एक संस्कृती विकसित केली आहे. अर्थात, आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि एकमेकांची काळजी घेतो. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही बैठक घेतली तेव्हा रिकी सर आणि श्रेयसचे आपल्याला एक संस्कृती जपावी लागेल हे बीदवाक्य होतं,” असं तो पुढे म्हणाला.
