नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
संपूर्ण देशभर गाजलेल्या इस्थर अनुह्या बलात्कार आणि हत्याप्रकरणात, सुप्रीम कोर्टाने आरोपी रिक्षाचालक चंद्रभान सानप याला निर्दोष ठरवलं आहे. इस्थर अनुह्या या इंजिनिअर तरुणीवर 5 जानेवारी 2014 रोजी बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चंद्रभान सानपला मुंबई सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टानेही कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे. तुला तुझ्या घरी सोडतो, असं सांगत 5 जानेवारी 2014 रोजी चंद्रभान सानपने इस्थर अनुह्याला दुचाकीवरुन अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेलं. तिथे तिच्यावर बलात्कार करुन सानपने तिची हत्या केली होती.
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
दरम्यान, चंद्रभान सानपने हायकोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इस्थर अनुह्या खटला प्रकरणाची सुनावणी, आज सुप्रीम कोर्टात झाली. सानपला 2015 मध्ये विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सानपने मुंबई उच्च न्यायालयात जाऊन फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयानेही सानपचे अपील फेटाळल्यानंतर सानपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने तपासात तफावत आढळल्याचे नमूद केलं. इतकंच नाही तर हा रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ असा गुन्हा ठरवता येणार नाही, असं म्हणत फिर्यादीच्या कथेत तफावत आढळून आल्याने आज सर्वोच्च न्यायालयाने चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता केली.
आंधातून मुंबईत आलेल्या इंजिनिअरवर बलात्कार
इस्थर अनुह्या ही इंजिनिअर तरुणी आंध प्रदेशातील आपल्या मूळ गावाहून मुंबईत नोकरीसाठी आली होती. 5 जानेवारी 2014 रोजी इस्थर मुंबईत पोहोचली. ती रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवर पहाटेच्या सुमारास उतरली. तिथे असलेल्या चंद्रभान सानपने इस्थरला तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून दुचाकीवरुन नेलं. मात्र इस्थरला अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेण्यात आलं. ही बाब लक्षात येताच त्याला इस्थरनं विरोध केला.
सानपने इस्थरला ईस्टर्न एक्स्प्रेसवर भांडुप परिसरातील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. तिचा मृतदेह तिथेच जाळून टाकला. पोलिसांना तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. विशेष महिला कोर्टाने हा प्रकार क्रूर तसेच अमानवी असल्याचं म्हणत सानपला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
कोण होती इस्थर अनुह्या?
मूळची आंध प्रदेशमधील असलेली इस्थर मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध प्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर सुट्टी संपल्यानंतर रेल्वेने मुंबईत परत आली. पहाटेच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस इथे उतरलेल्या इस्थरचा काहीच पत्ता लागत नव्हता. तब्बल दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडुपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली. इस्थरवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. मे महिन्यात क्राईम बँचने या प्रकरणी किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी चंद्रभान सानप या प्रकरणात दोषी असून त्याच्यावर बलात्कार करणे, दरोडा, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे अशा कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयात त्यावेळी एकूण 542 पानांचं आरोपपत्र आणि 42 साक्षीदार तपासले गेले. एलटीटी स्थानकात एकट्या इस्थरला चंद्रभान सानपने गाठलं आणि आपण टॅक्सी चालक असल्याचं सांगत घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. इस्थर त्याच्यासोबत जाण्यास तयार झाल्यावर त्याने एका निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इस्थरने त्याला विरोध करताच त्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपांत टाकून दिला. मात्र पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणण होतं. तेच सुप्रीम कोर्टाने आज ग्राह्य धरत, चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता केली.
