Spread the love

ओमराजे निंबाळकर म्हणतात, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार, खासदार झालो

धाराशिव/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या मदतीने ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार आणि काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता स्वत: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
धाराशिवमध्ये नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महायुतीकडून पालकमंर्त्यांचं स्वागत केले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केले. त्यानंतर धाराशिवमधून ठाकरेंना धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
ओमराजे निंबाळकरांनी काय म्हटले?
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, 1 वेळा आमदार 2 वेळा खासदार उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झालो. आता त्यांच्या संकट काळात सोडणार नाही. जिकडे खोबरे तिकडे चांगभलं हे सध्याचं राजकारण आहे. पण मी त्यापैकी नाही, असेही त्यांनी म्हटले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत त्यांनी सांगितले की, निवडणूक संपली की राजकीय विरोध संपतो. विकासाच्या मुद्यांवर आम्ही कालच्या बैठकीत खेळीमेळीने होतो. आता तलवारी घेऊन लढावे का, मग विरोध वाटेल असा उपरोधिक सवालही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यामुळे 1 वेळा आमदार 2 वेळा खासदार झालो. त्यांना संकट काळात सोडणार नसल्याचे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
कैलास पाटील यांनी मौन सोडले
आमदार कैलास पाटील हे देखील निवडणूक निकालानंतर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चांवर कैलास पाटलांनी यावर मौन सोडत स्पष्टच भाष्य केले. कैलास पाटील यांनी म्हटले की, सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही. आम्ही संघर्ष करू अन्‌‍ पक्ष वाढवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कैलास पाटलांनी पुढे म्हटले की, ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.