जळगाव/महान कार्य वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पसरलेल्या एका अफवेमुळे बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर दोन जणांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. यानंतर एका प्रवाशाने रेल्वेची साखळी खेचून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच इतर प्रवाशांनी ट्रेनमधून पळापळ केली. दरम्यान, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना चिरडलं आहे. ज्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी दुर्घटना कशी झाली? अफवा कुणी पसरवली? याबाबतचा सगळा घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला आहे. घटनेची माहिती देताना अजित पवार म्हणाले, पुष्पक रेल्वे मुंबईच्या दिशेनं येत असताना पाचोऱ्याजवळ रसोई यान बोगीच्या चहा विक्रेत्याने आग लागलीऽऽ आग लागलीऽऽ अशा आरोळ्या दिल्या. या आरोळ्या ऐकून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या उदलकुमार आणि विजयकुमार यांनी घाबरुन धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.
हा सगळा प्रकार बघून संपूर्ण बोगीत गोंधळ उडाला. आजुबाजुच्या बोगींमध्येही गोंधळ उडाला. सगळ्या बोगी एकमेकांना जोडलेल्या असतात. यावेळी काही प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजुला उड्या मारण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरू शकले नाहीत. त्यामुळे एका प्रवाशाने चैन ओढली, त्यानंतर रेल्वे थांबली. रेल्वे थांबताच प्रवासी दरवाजा आणि खिडकीतून खाली उतरू लागले. प्रवाशांनी खाली उतरल्यावर इकडं तिकडे जायला सुरुवात केली. दरम्यान, बेंगळुरूवरून नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना धडक दिली. यात अनेकांच्या शरीराची अक्षरश: दुर्दशा झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
आतापर्यंत 13 लोकांची मयत झाली आहे. 10 जणांचं पूर्ण शरीर मिळालं आहे. पण तिघांच्या शरीराचे तुकडे झाले. 10 जखमींमध्ये 8 पुरुष आणि दोन महिला आहेत. निव्वळ अफवेमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार सुरू आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.