Spread the love


मुंबई,17 मार्च
शिवाजी पार्कवरील सभेतून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोफ धडाडली आहे. संविधान बदलण्यासाठी, देशाचे नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवेय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा नारा ’अबकी बार 400 पार’ चा भाजपचा नारा आहे, पण यांना 400 पार का हवेय? संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना ’400 पार’ हवेय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
’संविधान, देशाचे नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवेय’
भाजपला 400 पार कशासाठी पाहिजे. यांची मंत्री म्हणतात आम्हाला घटना बदलायची आहे, म्हणून 400 पार पाहिजे. आज आपल्यासमोर एक वेळ घेऊन ठेवली आहे. देश हाच माझा धर्म, देश वाचला तरच आम्ही वाचू. व्यक्तीची ओळख देश झाली पाहिजे देशाची ओळख व्यक्ती नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आहे.
भाजपच्या फुग्यात आम्हीच हवा भरली
भाजप एक फुगा आहे. मला वाईट याचं वाटतं की, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात भाजपचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, त्यांच्या डोक्यात आता हवा गेली. काय त्यांची स्वप्न. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
लोक एकवटल्यावर हुकूमशहाचा अंत होतो
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ’कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाही कितीही मोठी असला, ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास थोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, त्यामुळे आपल्या मध्ये जो फूट पाडतोय त्याला थोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा अशी सांगायची वेळ आलेली आहे.’
उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरून रणशिंग फुंकलं
’तेजस्वी यादव यांनी जसा नारा दिला तसा मी देखील एक नारा या सभेत देतो. ते म्हणतात आपकी बार, मी म्हणतो आपकी बार भाजपा पार आणि याची सुरवात आजपासून झालेली आहे. मला मला खात्री आहे शिवाजी पार्क वरून जेव्हा रणशिंग फुकले जातात, मशाल हातात घेऊन आपल्याला रणशिंग महाराष्ट्रभर फुंकायचे आहे. मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालतो’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आजपासून लोकशाही रक्षणाची सुरुवात
उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपासून लोकशाही रक्षणाची सुरुवात होत आहे. मी त्या हुकूमशहांना सांगतोय, तुम्हाला असे वाटत असेल ज्यांना ज्यांना घाबरून तुम्ही पक्षात घेत आहात, ती म्हणजे देशाची जनता नाही. देशाची जनता माझ्यासमोर बसली आहे. जनता आमच्या सोबत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आपकी बार भाजपा तडीपार हा नारा घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.