Spread the love

कराड,28 मे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर विखारी टीका केली आहे. कराड चिपळूण रस्त्याचे किती वर्ष काम चालू आहे, काय करतोय इथला आमदार? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
तसंच सारखे जरा काही झाले की टीव्हीच्या पुढे सगळा मक्ता यालाच दिलाय. शिंदे साहेबांच्यावर बोलले तरी हीच भू..भु…भू. कुणावरही झाले की ह्यांनीच बोलायचे, माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा चढू द्यायची नसते, अशी टीका अजित पवारांनी शंभुराज देसाई यांच्यावर केली आहे.
पाटण बाजार समितीच्या निवडणुकीनंतर शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता, यावरूनही अजित पवारांनी टोला लगावला. शड्डू ठोकून विकासकामं होत नाही, आपली तब्येत काय, आपण करतोय काय? असे म्हणत अजित पवारांनी शंभुराज देसाई यांची खिल्ली उडवली.
सदाभाऊ खोत आणि शंभुराज देसाई यांच्यातल्या वादाचाही अजित पवारांनी समाचार घेतला. सदाभाऊ खोत यांनी शंभुराज देसाईंवर टीका केली. सत्तेची भांग प्यायल्यावर माणूस अंगात आल्यासारखा डुलायला आणि नाचायला लागतो, असा टोला सदाभाऊ खोत यांनी शंभुराज देसाईंना लगावला होता, त्यावर शंभुराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिले. सदाभाऊ खोतच भांग पित असतील, म्हणून त्यांनी नशेत असं वक्तव्य केले असेल, असा पलटवार देसाई यांनी केला.
सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे, तेच माहिती नाही. तो भाग्यवान माणूस कोण आहे ते माहिती नाही. शेतकèयांचा मोर्चा निघाला, पण पालकमंत्र्यांनी साधा फोनसुद्धा केला नाही. पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ऍम्ब्युलन्सही दिली नाही, याची नाराजी माझ्या मनात असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली होती. रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाच्या सांगता सभेसाठी मंत्री अतुल सावे उपस्थित होते. अतुल सावे यांच्यासमोरच सदाभाऊ खोत यांनी शंभुराज देसाईंबद्दलची नाराजी व्यक्त केली.