मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण सुरू आहे . गेल्या तीन दिवसांपासून विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मंगळवार दुपारपर्यंत मुंबईतील सगळे रस्ते पदपथ रेल्वे आणि बस स्थानक मोकळे करण्यास सांगण्यात आले आहे . मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे तर दुसरीकडे ‘मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही’ असा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलाय . मुंबई पोलिसांनी जी नोटीस आम्हाला दिली आहे त्याला आमचे वकील उत्तर देतील असं मराठा आंदोलन गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितलं आहे .मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत .आम्हाला आंदोलन करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतलाय.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह आरक्षण समर्थकांना आंदोलनाचा अधिकार असला तरी मुंबई ठप्प करण्याचा, गैरसोय करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा संताप सोमवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केला . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघर मध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केलेली असताना सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही असे विचारत न्यायालयाने सरकारलाही फटकारले .
मुंबई पोलिसांच्या नोटिशीवर मराठा समाजाची भूमिका
मुंबई पोलिसांनी जी नोटीस आम्हाला दिली आहे त्याला आमचे वकील उत्तर देतील .मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत आम्हाला आंदोलन करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही .काल कोर्टाने जे निर्देश दिले त्या निर्देशांचं आज संपूर्ण मराठा बांधव ठिकठिकाणी पालन करत आहेत .सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत .मनोज दादांनी सांगितल्यानंतर सगळी वाहन आणि मराठा बांधव हे मुंबईच्या बाहेर जाऊन थांबले आहेत अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे .असे मराठा आंदोलन गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितले .
कितीही त्रास झाला तरी शांत राहायचं…
जरांगे म्हणाले, माझा नाईलाज आहे, मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. मी मराठ्यांना काल देखील सांगितलं आहे, आजही सांगतो, गाड्या पार्किंगला लावा. मैदानात लावा, रेल्वेने प्रवास करा, बसने प्रवास करा. कुठे पार्किंगला जागा नसेल तर वाशीला नेऊन गाड्या लावा. दिलेल्या मैदानामध्ये गाड्या लावून मग या. तुम्ही शांत राहायचं. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी देखील तुम्ही शांत राहायचं. वेड्यासारखं करायचं नाही. मला माहिती आहे, तुम्हाला माझी माया येते मलाही तुमची माया येते तरी कितीही त्रास झाला तरी शांत राहायचं. मी मेल्यानंतर तुम्ही तरीही शांत राहायचं, असं माझं तुम्हाला आवाहन आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा पण माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई आपण शांततेत लढायची. पण मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मी हे देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतोय, मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही, फक्त कारणं करू नका. न्यायलयाच्या सर्व निर्णयाचं आपण पालन करायचं आहे. न्यायदेवता आपल्या गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, असंही मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटलं आहे.
