मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
”मूठभर इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजविण्यासाठी फोडा व राज्य करा या नीतीचा उपयोग करीत शेकडो वर्षे इथल्या एकसंघ समाजावर राज्य केले. आज महाविकास आघाडीतील मूठभर पक्ष याच कुटनीतीचा उपयोग करून गमावलेले मत व गेलेली पत मिळवण्याच्या प्रयत्नातून केवळ सरकारचीच नव्हे, तर मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्राची कोंडी करत आहेत. सत्तेच्या हावरटपणापायी राज्याला वेठीस धरण्याचे विरोधकांचे भान आणि सोयरसुतक संपले आहे हेच यातून दिसते,” अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
एका समाजाचे आरक्षण काढून त्याला…
‘ही तर महाराष्ट्राची कोंडी’ या मथळ्याखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ”मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस.. लोकशाहीत न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करायचा पूर्ण अधिकार आहे व सरकारही जरांगेशी सकारात्मक भावनेने संवाद साधत आहेच. एका समाजाचे आरक्षण काढून त्याला अस्वस्थ करीत ते आरक्षण दुसऱ्या समाजाला देणे हे सामाजिक वीण अडचणीत आणण्यासारखे आहे. याऐवजी दुसऱ्या समाजाकरिता आरक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करणे व ते कायदेशीर बाबींवर टिकविणे हाच यावरचा मार्ग आहे व तोच मार्ग स्वीकारून युती सरकारने 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ केले व त्यानुसार आता भरती, प्रवेशही होत आहेत,” असं केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शरद पवारांचा उल्लेख
”पण आता या निमित्ताने सरकार कसे अडचणीत येईल यासाठी दिवसरात्र मेहनत करताना दोन्ही समाजांनी आपआपसात झुंजावे व मतांच्या लोण्याचा गोळा मात्र आपल्या मुखात पडावा असा कट रचला जात आहे. शरद पवार यांचा पक्ष विदर्भात मंडल यात्रा सुरू करतो व त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी मागणी करतो त्याच वेळी मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवतो,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी शरद पवारांच्या पक्षाची भूमिका दुटप्पी असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय.
वरवरचा दावा करून…
”मराठा मूक मोर्चाचा मुका मोर्चा संबोधणारे व मराठा आरक्षण ज्यांच्या ढिसाळ कारभारामुळे गेले ते उध्दव ठाकरे आता मराठा समाजाबद्दल कळवळा दाखवत आहेत. ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या जरांगे यांच्या मागणीवर यातला एकही पक्ष ठाम भूमिका घेत नाही केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असा वरवरचा दावा करून वेळ मारून नेतो,” असं केशव उपाध्येंनी पोस्टमध्ये म्हटलंय.
”ही नीती महाराष्ट्राची सामाजिक समतेची वीण उसवणारी आहे. दुर्दैवाने तसे झालेच, तर त्याचे खापर महाविकास आघाडीच्याच माथी मारले जाईल,” असं त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलंय.
