चंद्रपूर / महान कार्य वृत्तसेवा
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य हे नेहमीच चर्चेत असते. देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक ताडोबात येत असतात. ताडोबाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील वाघ. येथील प्रत्येक वाघाचे एक वैशिष्ट्यै आहे. सध्या ताडोबाच्या जंगलाचा राजा आहे तो छोटा मटका. मात्र व्याघ्र प्रकल्पातील सीएम अर्थात छोटा मटका वाघाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. छोटा मटका सध्या गंभीर जखमी आहे अशा अवस्थेतदेखील तो पाळीव प्राण्यांची शिकार करतोय.
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला सीएम अर्थात छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय. महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला. ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले असले, तरी मटकासुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला.
छोटा मटका गंभीर जखमी झाल्याने परिणामी तो उपासमारीने मरू शकतो, हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे. अशातच त्याने एका गायीची शिकार केली. हे चित्र आशादायी असले, तरी ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीच गंभीर झाली. आता तो जगण्यासाठी अक्षरश: संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे. तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे, या वाघाला वाचवण्यासाठी वनविभागाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे.
वाघ- मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाची ठोस उपाययोजना चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघ -वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलविले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ- मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने ही ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. मागील काही वर्षात वाघांना क्षेत्र अपुरे पडू लागल्याने झुंजीत 8 वाघांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे मानवावरील हल्ले चिंताजनक स्थितीत पोचल्याने बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थांत वाघ संरक्षणाप्रती नकारात्मक भावना निर्माण होत होती. ताडोबातील वाघ आणि वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि राज्याबाहेरील ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात हे वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहेत. आगामी काळात रीतसर परवानग्या घेऊन आणखी वाघ हलविले जाण्याची योजना आहे. विशेष म्हणजे या आधी स्थलांतरित केलेल्या वाघ वाघिणींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
