नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. बिहारमधील मतदारयादींचा फेरआढावा आणि कथित मतचोरींच्या आरोपावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज विरोधकांच्या इंडिया आघाडीची राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकी विविध मुद्यांवर चर्चा झाली.
बिहारमध्ये काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी एघ्ठ ला विरोध केला होता. त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. भाजप मते चोरत आहे आणि निवडणूक आयोग यामध्ये त्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्षातील संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत बैठक झाली असली तरी निर्णयावर शिक्कामोर्तब झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने काय म्हटले?
रविवारी (17 ऑगस्ट) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले होते की, मत चोरीचा आरोप खोटा आहे आणि आयोग किंवा मतदारांना त्याची भीती वाटत नाही. आयोगाने लोकांना मतदानाचा हक्क निश्चितपणे वापरण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने राहुल गांधींविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती आणि त्यांच्याकडून पुरावे मागितले होते.
बिहारमध्ये एसआयआर दरम्यान मतदार यादीतून सुमारे 65 लाख लोकांची नावे वगळण्यात आली होती. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सर्व नावे सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाने आदेशानुसार सर्व नावे वेबसाइटवर अपलोड केली होती.
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा उमेदवार?
एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केले आहे. भाजपचे अनुभवी नेते असण्याव्यतिरिक्त, ते बराच काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. मात्र, इंडिया आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विरोधी पक्षांचे नेते सोमवारी संध्याकाळी चर्चा करून उमेदवार जाहीर करू शकतात.
