Spread the love

नांदेड / महान कार्य वृत्तसेवा

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक  गावात हाहाकार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. मुखेडमधील तीन गावात शंभरहून अधीक लोकं अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुखेड तालुक्यातील हसनाळ, रवानगाव, भासवाडी येथे 100 हून लोक अडकले आहेत. पहाटे ढगफुटीसारखा पाऊस आणि लेंढी प्रकल्पाचे पाणी गावात शिरले. पावसाचा अलर्ट असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणुन सैन्य दलाला पाचारण  करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी निघाल्याची माहिती प्रशासनाकून देण्यात आली आहे.

अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरु-

पावसाच्या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.  पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढलंय, यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी आक्रोश केलाय. इतर गावातही अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान हसनाळ आणि रावणगाव इथे काही लोक अडकले आहेत. तर दुसरीकडे इटग्याळ येथे अडकलेली कारला बाहेर काढण्यात आली.

इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा नदीला पूर-

नांदेड जिल्ह्यातील झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नांदेड जिल्हयातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहुर या चार तालुक्यात नदी काठच्या शेतात मोठया प्रमाणावर पाणी साचले. सध्या नांदेडमध्ये पावसाने उघडीप दिली, मात्र पाण्याची आवक सूरू असल्याने पूर ओसरला नाही. सोयाबीन, कापूस, मूग, तूर ही पीक अख्खी पाण्याखाली गेली. सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. दरम्यान बुडीत क्षेत्र जाहीर करुन तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.