Spread the love

कार्यारंभ आदेश जारी ; ३९५ कोटीची निविदा मंजुर
खासदार धैर्यशील माने यांची माहिती

विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा

औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून, या निधीमधून जीएसटी,भाववाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये ३९५ कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीला सोमवारी देण्यात आला. अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ईराप्पा नाईक, उपअभियंता अमित भुरले,इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव,असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, आभिषेक सिंग उपस्थित होते.
जुलै २०२२ रोजी खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या.त्यानंतर नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.या बैठकीस खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होण्याच्या अनुषंगाने हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीमधील नदीत मिसळणारे रसायनमुक्त पाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती.त्यास त्वरित तत्वतः मान्यता देऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाहेरील पंचगंगा नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महामंडळाने सादर केलेल्या डीपीआर ला मंजुरी देऊन सप्टेंबर २०२४ रोजी ६०९.५८ कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला.यामध्ये जीएसटी, भाववाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये ३९५ कोटींची निविदा मंजूर करून सदर कामे ‘इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. एआयईपीएल’ या देशातील नामांकित कंपनीला सोपवण्यात आली.



असा होणार निधी वाटप

या प्रकल्पासाठी निधी वाटपाचे सूत्र ठरले असून वस्त्रोद्योग विभाग २५%, उद्योग विभाग ५०% आणि पर्यावरण विभाग २५% असे नियोजन करण्यात आले आहे.

प्रकल्पांतर्गत इचलकरंजी, हातकणंगले व पार्वती औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) सह उन्नतीकरण, क्षमता वाढविणे तसेच सुमारे ८१ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिनी व पुनर्वापर पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुधारणा केली जाणार आहेत. ‘इन्हायरो’ या कंपनीने याआधी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी, काशी, मथुरा यांसारखे ‘नमामी गंगे’ अंतर्गत प्रकल्प तसेच राजस्थानमधील एसटीपी अपग्रेडेशनची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे  सहकार्य मिळाले असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली. 




एक थेंब ही दूषित पाणी पंचगंगात मिसळणार नाही

सदर कामे दोन वर्षात पूर्ण करून झेडएलडी प्रकल्प असल्याने या तिन्ही औद्योगिक वसाहती मधील एक थेब ही पाणी पंचगंगा नदीत मिसळणा नाही.हा प्रकल्प पंचगंगेला नवजीवन देईल,औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधेल.मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न आता साकार होईल.

  • धैर्यशील माने,खासदार