Spread the love

राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

मतचोरीवरून भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता पूर्ण तयारीनिशी दंड थोपटले आहेत. मतचोरी उघड करण्यासाठी त्यांनी जनमोहीम उघडली असून मिस्ड कॉलसाठी नंबर तसेच तक्रार दाखल करण्यासाठी पोर्टलही लॉन्च करत पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आयोगाकडून येणाऱ्या इशाऱ्यांसमोर न झुकता त्यांनी आपली लढाई सुरुच ठेवली असून आजही त्यांनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत भाजप आणि आयोगाची खरडपट्टी केली.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मतांची चोरी ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून आमची मागणी स्पष्ट आहे, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वत: तिचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील व्हा आणि या मागणीला पाठिंबा द्या. हीींं:ि/र्/ेीींंशलहेीळ.ळप/शलवशारपव ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या. ही लोकशाहीच्या रक्षणासाठीची लढाई आहे.

मोदी मत चोरी करून पंतप्रधान झाले

नरेंद्र मोदी 25 जागांच्या फरकाने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपने 35 हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या 25 जागा अशा आहेत. जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी चोरी करून पंतप्रधान झाले आहेत, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने गेल्या 10 वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी द्यावी. जर हे सर्व दिले नाही तर तो गुन्हा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आम्ही भाजपला निवडणूक चोरण्याची परवानगी देत आहोत. संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडे मतदारांचा डेटा मागितला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, मतदारांच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना फटकारले आणि म्हटले की त्यांनी नियमांनुसार स्पष्ट घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करावे किंवा त्यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांसाठी देशाची जाहीर माफी मागावी. राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर मतदार यादीत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असाही दावा केला की निवडणूक आयोग कर्नाटक, तामिळनाडू आणि हरियाणामध्ये भाजपला पाठिंबा देत आहे. याबाबत राहुल यांनी दिल्लीतील इंदिरा भवन येथे 1 तास 11 मिनिटांचे सादरीकरण केले. इंडिया अलायन्सच्या खासदारांनीही राहुल यांना पाठिंबा दिला आहे.