बंगळुरू / महान कार्य वृत्तसेवा
ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व दलांनी परस्पर समन्वय राखून स्वत:चे प्राधान्यक्रम निश्चित केले आणि शत्रूवर हल्ल्याची एक प्रभावी योजना आखली. ही योजना कशी असावी किंवा कशी असू नये अशा स्वरुपाचे कोणतेही बंधन सरकारने सैन्यावर घातले नव्हते. हल्ला कधी सुरू करावा आणि कधी थांबवावा याबाबतचे निर्णय सैन्याने घेतले; असे भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे कसे मोडले याची माहिती त्यांनी दिली.
भारताच्या सैन्य दलांनी परस्पर समन्वय राखून एक प्रभावी योजना राबवली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 300 किमी. लांबून अचूक हल्ला केला. या हल्ल्याद्वारे भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. पाकिस्तानच्या नष्ट झालेल्या विमानांमध्ये एफ 16 विमानांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी केला. भारताने कसा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमध्ये काय वाताहात झाली याची सविस्तर माहिती त्यांनी एका सादरीकरणाद्वारे दिली. पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केल्याचेही एअर चीफ मार्शल म्हणाले.
एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात बोलताना एपी सिंग यांनी एस – 400 क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पाकिस्तानची विमानं नष्ट झाल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टिमने अर्थात एस – 400 ने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आलं होतं. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे अतिरेकी तळ नष्ट केले.
भारताने 90 मिनिटांचया एअर स्ट्राईकद्वारे नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस, पंजाबमधील मुरीद एअरबेस, सिंधमधील सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कार्दू एअरबेस, कराचीजवळील भोलारी एअरबेस, जेकबाबाद एअरबेस आणि पसरूर एअरस्ट्रिपवर हल्ला केला, असे एअर चीफ मार्शल म्हणाले.
