मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने यावर्षी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधला मुंबई क्रिकेट संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी मुंबई संघाची साथ सोडून गोवा संघासोबत खेळणार होता, यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी सुद्धा मागितली होती. पण काही दिवसांनी त्याने या निर्णयावरून यू-टर्न घेतला आणि मुंबई संघासोबतच भविष्यात खेळणार असल्याचं सांगितलं. आता यशस्वीच्या या निर्णयाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. असं म्हटलं जातंय की रोहित शर्माच्या सांगण्यावरून यशस्वीने याबाबतचा निर्णय घेतला होता.
रोहित शर्माने यशस्वीची घातली समजूत :
मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार, भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल सोबत बोलणं केलं. त्याने यशस्वीला मुंबई संघ सोडण्यापासून रोखले. रोहितने यशस्वीला समजावलं की, करिअरच्या या टप्प्यावर असताना त्याने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ बदलणं योग्य नाही. तसेच भारतीय संघासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मुंबई संघाची भूमिका याबाबत आठवण करून दिली. त्यानंतर यशस्वीने त्याचा निर्णय बदलला.
एमसीए अध्यक्षांनी केला खुलासा :
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या रिपोर्टचा हवाला देत म्हटले की, ‘रोहितने यशस्वीला त्याच्या करिअरमधील या टप्प्यावर मुंबई संघासोबत राहण्यास सांगितले. रोहितने त्याला समजावले की मुंबईसारख्या टीमसाठी खेळणं खूप गर्व आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे. मुंबईने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. रोहितने यशस्वीला असेही सांगितले की त्याने हे विसरू नये की मुंबई क्रिकेटमुळेच त्याला त्याची प्रतिभा दाखविण्याचे आणि भारतासाठी खेळण्याचे व्यासपीठ मिळाले आणि यासाठी त्याने या शहराचे आभार मानले पाहिजेत. यशस्वीने सुरुवातीला मुंबईच्या मैदानांवर खेळायला सुरुवात केली आणि नंतर त्याची मुंबई संघाच्या सर्व वयोगटातील संघांमध्ये निवड झाली’.
