सतेज पाटलांच्या मोहिमेत 2 लाख 4 हजार 421 नागरिकांच्या स्वाक्षरी; जनआक्रोश राष्ट्रपतीपर्यंत पोहोचणार
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा (विकास लवाटे)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर एकच जनआक्रोश सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हत्ती परत मठामध्ये परतला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्नांची शर्थ सुरु आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सह्यांची मोहीम राबवली. सतेज पाटील यांच्या मोहिमेमध्ये तब्बल 2 लाख 421 लोकांनी स्वाक्षरी केली असून हा जनआक्रोश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि जिव्हाळ्याचे नाते असणारी ”महादेवी” हत्तीण नांदणी मठाकडे परत यावी, अशी कळकळीची जनभावना व्यक्त करणाऱ्या 2 लाख 4 हजार 421 लोकांच्या स्वाक्षरी असलेल्या सर्व फॉर्मचे पूजन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते नांदणीमध्ये करण्यात आले.
सह्यांचे अर्ज राष्ट्रपतींना पाठवणार
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक शेखर पाटील, नांदणी बँक चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, राहुल खंजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत ,नितीन बागे आदींसह भक्तांची उपस्थिती होती. जनभावना भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कोल्हापुरातून रमणमळा पोस्ट ऑफिसमधून हे फॉर्म राष्ट्रपती भवन येथे पाठवण्यात येणार आहेत.
वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मठाधिपती यांच्याशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. महादेवी हत्तीणीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. खासदार धनंजय महाडिक व धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली. पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले. जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं आबिटकरांनी माहिती दिली.
