Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.

2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.

आज कोर्टात काय काय घडलं?

1. आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत- हायकोर्ट

2. साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत- हायकोर्ट

3. स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य- हायकोर्ट

4. स्फोटांसाठी वापरलेले बाँब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश- हायकोर्ट

5. बॉम्बच माहित नाही तर मिळालेल्या बाँब, बंदुका,नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही- हायकोर्ट

6. बॉम्ब, बंदुका, नकाशे जुळून आले नाही- हायकोर्ट

नेमकं काय घडलं होतं?

मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत पाच ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत झालेल्या 7 स्फोटांनी मुंबई हादरली होती. 2015 साली सत्र न्यायालयाने 13 आरोपींपैकी बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.