मीरा-भाईंदर / महान कार्य वृत्तसेवा
बिगर मराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांकडून दिसेल त्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात येत आहे. या प्रकारामुळे मीरा रोडमधील ओम शांती परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. तर, भाजपचे मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचा हेतू चांगला होता. पण, आजच्या मोर्चाचा हेतू चांगला नव्हता असे वक्तव्य केले आहे.
पोलिसांकडून मराठी संघटनांच्या मोर्च्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी काही सामान्य मराठी भाषिकांनादेखील ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून मीरा रोड येथील ओम शांती चौकात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मराठी मोर्चेकरी दिसताच त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या आक्रमक पावित्र्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. तर, दुसरीकडे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी मोर्चाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.
नरेंद्र मेहता काय म्हणाले?
विधीमंडळाच्या आवारात बोलताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटले की, मोर्चा काढण्यास कोणाचीही हरकत नाही. सगळेच मोर्चे काढतात. पण, व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचा हेतू चांगला होता. पण, आजच्या मराठीच्या नावाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा हेतू चांगला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या मोर्चा मागे काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांची फूस होती असे त्यांनी म्हटले. आजच्या मोर्चाचा हेतू वाईट होता, अशी माहिती पोलिसांच्या गुप्त माहिती होती. त्यामुळेच कारवाई झाली असल्याचे मेहता यांनी सांगितले.
मोर्चाआधीच अविनाश जाधवांसह अनेकजण ताब्यात…. आज सकाळी मोर्चा काढण्याआधी मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याशिवाय, मनसे आणि इतर संघटनांच्या पदाधिर्कायांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
