यवतमाळ / महान कार्य वृत्तसेवा
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. राजकुमार जयस्वाल यांच्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीला या अपघातात प्राण गमवावे लागले आहे. हे जयस्वाल कुटुंबीय यवतमाळमधील वणी येथे राहणार आहेत. फक्त त्यांचा मुलगाच बचावला असल्याची माहिती समोर आली आहे.
केदारनाथ धाम अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
या हेलिकॉप्टर अपघातामध्ये महाराष्ट्रातील तीन जण ठार झाले आहेत. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल या दाम्पत्यासह त्यांनी 2 वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल हिचादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. जयस्वाल कुटुंब काही दिवसापूर्वीच उत्तराखंडमध्ये दाखल झाले होते. आज पहाटेच्या वेळी हेलिकॉप्टरने केदारनाथला जाताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यात या कुटुंबावर काळाने घाला घातला.
हेलिकॉप्टर अपघातात जयस्वाल कुटुंब उद्धवस्त झाले. पण, त्यांचा मुलगा मात्र यवतमाळमध्येच असल्याने तो बचावला. राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा पांढरकवडा येथील त्याच्या आजोबाकडे थांबला होता. त्यामुळे केदारनाथला जाऊ शकला नाही. त्यामुळेच तो बचावला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या जयस्वाल कुटुंबाच्या वणी आणि पांढरकवडा येथील निवासस्थानी शोक व्यक्त केला जात आहे.
या चारधाम यात्रेदरम्यान वेगवेगळ्या धामांवर हेलिकॉप्टर कोसळले आहेत. तसेच हेलिकॉप्टरचे अनेक वेळा आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अलिकडेच रस्त्याच्या मधोमध एक हेलिकॉप्टर कोसळले होते. चारधाम यात्रेच्या सुरुवातीला एक हेलिकॉप्टरही एकदा कोसळले होते, ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता.
