मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये हवामानाचा अंदाज काय?
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 जून रोजी मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरीची शक्यता आहे. 2 ते 4 जून दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस कायम राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, पुढचे 48 तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ते 4 जून दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील.
इशान्य भारतात मुसळधार पावसानं घातलंय थैमान-
मान्सूनच्या आगमनापासून इशान्य भारतात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. त्यामुळे अरूणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीमआणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे दीड हजार पर्यटक अडकले आहेत. तर मेघालयातील भुस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 8 पर्यटकांचा शोध अद्यापही सुरू आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला.
