Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

काश्मीर हे आपले आहे. काश्मीर कालही आपले होते, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते शनिवारी शिवसेना भवनात आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत. ‘वन नेशन वन इलेक्शन’चा अभ्यास सुरु आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन करतायत ते ठीक आहे. पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. आमचे जहाज बुडणारे नाही. तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे. अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट,प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आज उद्धव ठाकरे यांनी सगळ्या नेत्यांची बैठक बोलावली होती. संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख सर्वजण बैठकीला होते. राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे इतर राज्यातील प्रश्न हे बाजूला राहिले आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लाडकी बहीण शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न विचारात घ्यावे आणि त्यावर काम करावं. जनसामान्यांचे प्रश्न समजून घ्यावे उद्धव ठाकरेंनी सर्वांना सांगितल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले.