अजित पवारांनी सांगितला महिला आरक्षण बिल पास करतानाचा शरद पवारांचा ”तो” किस्सा
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवारांबाबतचा महिला आरक्षण देतानाचा एक किस्सा सांगितला आहे. अजित पवार म्हणाले, महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आपण दिले आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे, म्हणून राजकारणात हे आरक्षण आणले असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणले, पवारसाहेबांनी सांगितले होते की, हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील. मला आठवत आहे की, सभागृह चार वाजेपर्यंत चालवले आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतले. साहेबांनी ठणकावून सांगितले की, आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पास झाले होते. असा महिला आरक्षण बिल पास करतानाचा किस्सा अजित पवारांनी सांगितला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, आज मुली सगळीकडे पुढे जात आहेत. मुली फक्त अभ्यासातच लक्ष देतात त्या मुलांसारखं इकडे तिकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे ज्या देशात महिलांना सन्मान दिला जातो ते देश पुढे आहेत. जिथं महिलांना सन्मान दिला जात नाही तो देश मागासलेला असतो. मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे. आता भिडे वाडा सरकारने ताब्यात घेतला आहे. तिथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली, होती तिथं काम आता सुरू केले आहे, असेही पुढे अजित पवारांनी म्हटले आहे.
पहेलगाममध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारले, पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवले पाहिजे अशी भावना आपली होती, आणि त्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो.
त्याही वेळी दोन महिला अधिकाऱ्यांनी मिडिया समोर येऊन माहिती दिली. विंग कमांडर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह अशी त्यांची नावे आहेत. काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली हे चुकीचं आहे, आम्हाला याचे वाईट वाटते असेही अजित पवारांनी पुढे म्हटले आहे.
