Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणारा एक चित्रपट येत आहे. ‘चल हल्ला बोल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट प्रामुख्याने दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितलं आहे. या कवितांमध्ये शिव्या आहेत, अश्लीलता आहे असं मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडलं. त्यानंतर या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळांबाबत माहिती दिली असता त्याने ”कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही”. असं उद्दाम वक्तव्य केलं. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते व महाराष्ट्रातील जनतेने संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी व कवयित्री मलिका अमिर शेख यांनी देखील या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा उद्दाम अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावं अशी मागणी मलिका अमर शेख यांनी केली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. अशा व्यक्तीची तुम्ही सेन्सॉर बोर्डावर कशी काय नियुक्ती करता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मलिका अमर शेख म्हणाल्या, ”ज्या माणसाने त्याच्या शब्दप्रभूत्त्वाने संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल .केलं जाने केवळ आपल्या मातीतच नव्हे तर जागतिक साहित्यात नाव कमावलं. आपल्या मराठीचा झेंडा जगभर मिरवला. अशा माणसाचं नाव घेऊन तुम्ही त्यांचा अपमान करता. नामदेव ढसाळ यांचा अपमान करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केलं पाहिजे. मी या घटनेचा तीव शब्दांत निषेध करते. त्या माणसाला त्याच्या पदावरून काढून टाकलं पाहिजे, अशी मी मागणी करते. मुळात अशी माणसं तुम्ही इतक्या महत्त्वाच्या पदांवर नेमताच कशी?”