पुणे/महान कार्य वृत्तसेवा
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असताना या जीबीएस आजाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे होतं असल्याचे या आधी सांगण्यात आलं होतं, तसा दावा देखील करण्यात आला होता. मात्र या आजाराचे संक्रमण होण्यामागे आणखी एक कारण समोर आले आहे.
जीबीएस आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर, कोंबड्यांमुळे होतं असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले. तर कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आपल्याकडे खडकवासला भागात मधल्या काळात जे काही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस चे रुग्ण आढळून आले. त्यात प्रथम दर्शनी असे वाटले होते की हा आजार पाण्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे होत आहे. मात्र खडकवासल्याच्या भागात काहींचे म्हणणे आहे की, कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झालाय. त्यामुळे मी या संदर्भात सविस्तर माहिती आता घेतली असून त्या बाबतीत माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. जिथे हा आजार आढळून आला आहे त्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे कारण नाही. पण कोंबड्यांचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे.असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
