राहुरी/महान कार्य वृत्तसेवा
शनिशिंगणापूरच्या शनि देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. मात्र आता याच अभिषेकबाबत शनि शिंगणापूर देवस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिदेवाच्या अभिषेकसाठी आता केवळ ब्रॅंडेड तेलाचाच अभिषेक घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रॅंडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता शन देवाला तैलाभिषेक करण्यासाठी आता भाविकांना ब्रॅंडेड तेलाचाच वापर करावा लागणार आहे. दरम्यान,भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार, असल्याचेही मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
