अमित शाहंच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग
दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पार्टीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. 70 पैकी जवळपास 48 जागांवर ऊाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 22 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. दरम्यान, दिल्लीत भाजपला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठी एक नाव आघाडीवर आहे. अरविंद केजरीवालांचा पराभव करणारे भाजप नेते परवेश वर्मा हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा मोठा पराभव केला आहे. हा आम आदमी पार्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार आहे. मात्र, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरु आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर प्रवेश वर्मा यांनी ट्वीटरवर जय श्री राम असे लिहिले आहे.
नवी दिल्लीची जागा जिंकणारा नेता मुख्यमंत्री?
विशेष म्हणजे गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्लीची जागा जिंकणारा नेता मुख्यमंत्री झाला आहे. अरविंद केजरीवाल 2013, 2015 आणि 2020 मध्ये या जागेवरून विजयी झाले होते. या तिन्ही वेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. 2013 मध्ये केजरीवालांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. शीला दीक्षित देखील या जागेवर एकदा निवडून आल्या होत्या. याआधी त्या गोल मार्केटमधून दोनदा निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 2008 मध्ये गोल मार्केटची नाव बदलले होते, त्याचे नाव बदलून नवी दिल्ली ठेवण्यात आले होते.
परवेश वर्मा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट
निवडणूक जिंकल्यानंतर परवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेली मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला होता. आज अरविंद केजरीवालांचा पराभव केल्यानंतर परवेश वर्मा यांनी ट्वीटरवर जय श्री राम लिहिले आहे. जे सरकार स्थापन होत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने येणार आहे. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेचा विजय असल्याचे परवेश वर्मा म्हणाले.