सातारा/महान कार्य वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपण नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावे लागेल असेही ते म्हणाले आहेत. तसंच 235 गावे अंतर्भुत असून 295 गावांनी आणखी मागणी केली आहे असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
दरम्यान साताऱ्यातील आपल्या गावी जाण्यावरुन होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले की, ”कोण काय बोलते याकडे मी लक्ष देत नाही. मी येथे कामात आहे. नवीन महाबळेश्वरा हा मोठा प्रोजक्ट आहे. याच्या मागे लागलो आहे. मी गावी आलो की नाराज झाले असे म्हणतात. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल, या भागात फिरावे लागेल. प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा मोठा परिसर आहे. 235 गावे अंतर्भुत आहेत. 295 गावांनी आणखी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जी कामे करायची आहेत ती भुमीपूत्र म्हणून घ्यावी लागतील”.
पुढे ते म्हणाले, ”या भागाचा कायापालट करणे हाच माझा उद्देश आहे. संपूर्ण विकास करणे, महाराष्ट्रात पर्टयटनाला चालना, वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना विकसित करणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना जिथे शक्यत आहे त्याची पाहणी करा असे सांगितले आहे. काही ठिकाणी आम्ही, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील. या भागाचा विकास, कायापालट करणे, आणि अमूलाग्र बदल घडवणं तसंच इतिहास, संस्कृती जोपासणे, वाढवणे हा देखील उद्देश आहे”.
भरत गोगावले यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, ”अपेक्षा करणे यात वावगे काय? इतकी वर्षं त्यांनी रायगडमध्ये काम केले आहे. अपेक्षा ठेवणे, मागणी करणे यात काही चुकीचे नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू”.
