अंतरवाली सराटी / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णायक आंदोलनाची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंबईत उपोषण आंदोलन सुरू होणार असून गुलाल उधळूनच पुन्हा माघारी येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे जाण्याचा मार्गदेखील बदलला असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या हातात दोन दिवस आहेत. आम्हाला मुंबईला यायचे नाही. आमच्या मागण्या आज उद्या मध्ये मान्य करा संधी आहे त्याचे सोने करा असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले. त्याच वेळी जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मराठा समाजाला आवाहन करताना सगळी कामधंदे बंद करावेत आणि मुंबईकडे यावं असे आवाहन त्यांनी केले.
आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे जाणार आहे. मुंबईत आम्ही 29 ऑगस्ट रोजी पोहचणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईकडे जाणारा मार्ग हा पैठण, अहिल्या नगर, पांढरी फाटा, कल्याण फाटा नेप्ती चौक, आळे फाटा, नारायण गाव, किल्ले शिवनेरी येथे मुक्काम करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. राजगुरु खेड मार्ग, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, चेंबूर या मार्गाने 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. चाकण मार्गे आम्ही मुंबईला जाणार आहोत. अति धोकादायक असल्याने माळशेज-कल्याण मार्गे जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांनी म्हटले की, मुंबईत शेकडो रस्ते आहेत. एक रस्ता आम्हाला द्या, एवढंच आमची मागणी आहे. आम्हाला कोणाची कोंडी करायची नाही, त्रास द्यायचे नसून आम्ही हक्काचे आरक्षण मागत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. मनोज जरांगे यांनी म्हटले की, मराठा-कुणबी एकच आहे हे मान्य करावे. ओबीसींना विरोध करायचा मुद्दा नाही. आमच्याकडे कागदपत्रे नसतील तर मान्य करू पण जाणीवपूर्वक आम्हाला आरक्षणातून वगळू नका, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.
