नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
शनिवार घातवार ठरला, गंगेत स्नान करुन घरी परतणाऱ्या भाविकांना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गंगा स्नान करुन घरी येत असताना भरधाव टँकरने धडक दिली आणि होत्याचं नव्हतं झालं. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोचा अक्षरश: चुरा.डा झाला आहे. टेम्पोचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. भरधाव तेलाच्या टँकरने भाविकांनी भरलेल्या टेम्पोला धडक दिली आणि घात झाला.
या भीषण अपघातानंतर बराच वेळा वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर मृतदेह आणि रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारची राजधानी पटना इथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फतुहा इथून हे गंगा स्नान करुन परत येत असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. टँकरचे ब्रेक फेल झाले होते का? हा अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समोर आलं नाही. मृतांमध्ये 7 महिला आणि एक पुरुष समावेश आहे. कुटुंबियांनी या दुर्घटनेनंतर टाहो फोडला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर टँकर ड्रायव्हर फरार झाला आहे.
