Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आज समुद्राला भरती असल्याकारणामुळे, पाऊसाचा जोर कायम राहिला तर मुंबईची तुंबई होण्यास वेळ लगणार नाही, याचा अंदाज घेत हवामान खात्याने कालच मुंबई तसेच मुंबई लगतच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला होता. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर केली. त्यानुसार आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असून, मुंबईच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही परिस्थिती दुपारी देखील कायम राहिली तर मुंबईचे जनजीवन आणखीनच विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता

चिंतेची बाब म्हणजे, आता भरतीला सुरुवात झाल्यामुळे मुंबईतील मुख्य नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीचे फ्लडगेट बंद झाले आहेत. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी वापरात असणाऱ्या आपत्तीकालीन दरवाजे सध्या बंद करण्यात आल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंगळवारच्या अपडेटनुसार, मुंबईतील पवई आणि विहार तलावांमधून निघणाऱ्या मिठी नदीने कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजारजवळील क्रांतीनगर परिसरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुर्ला परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी साचू लागले आहे.  त्यामुळे तेथील स्थानिकांना जवळच्या मगन नथुराम म्युनिसिपल स्कूलमधील निवारा स्थळी हलवले जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना स्थलांतरित करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रूझ येथील काही भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी मिलन सबवे तर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. आजूबाजूच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दिवसभर मुंबईत दाणादाण उडाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात साचलं असून त्याचा रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकलची वाहतुकीही संत गतीनं सुरू आहे.